शहरात १११ पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव्य   

पुणे : पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने देशात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास सांगितले आहे. शहरात सध्या १११ पाकिस्तानी दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आले आहेत. त्यातील तिघांनी भारत सोडल्याचे पुणे शहर पोलिस दलातील परकीय नागरिक विभागाकडून सांगण्यात आले. दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आलेल्यांमध्ये ३५ पुरुष व ५६ महिला आहेत. तर, व्हिजिटर व्हिसावर आलेले २० नागरिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
पाकिस्तानातून अनेक नागरिक नातेवाईकांकडे तसेच, वैद्यकीय कारणासाठी दीर्घ मुदतीच्या व्हिसावर भारतात येत असतात. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतातील २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर, केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली. तसेच, अटारी-वाघा सीमेवरील तपासणी नाके बंद केले. तेथून आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना १ मे पर्यंत त्यांच्या देशात परत जाता येणार असल्याचे केंद्र सरकारने सांगितले.
 
पुण्यात राहणार्‍यांपैकी तीन पाकिस्तानी नागरिकांनी गुरूवारी पुणे पोलिसांकडून एक्झिट पत्र घेऊन, शहर सोडल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क या परिसरांमध्ये हे नागरिक वास्तव्यास आहेत. परदेशातून आलेल्या कोणत्याही नागरिकांना ते ज्या शहरात जातात, तेथील जवळच्या पोलिस आयुक्तालय किंवा अधीक्षक कार्यालयात नोंद करावी लागते तसेच एका शहरातून दुसर्‍या शहरात जायचे असेल तरी तशी नोंद करावी लागते. याशिवाय, वेळोवेळी पोलिसांकडून परदेशी नागरिक त्यांनी दिलेल्या पत्त्यावर वास्तव्य करत आहेत ना?, ज्या कारणासाठी ते आले आहे, त्याव्यतिरिक्त इतर काही करत नाहीत ना?, याची तपासणी केली जाते.

Related Articles